पंतप्रधान मोदींनी निवडले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव   

पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या कारवाईला ‘ऑपरेशन’ सिंदूर’ हे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दिले होते, असे अधिकृत सूत्रांनी बुधवारी सांगितले.
 
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ जणांची गोळ्या झाडून हत्या केली होती. यात बहुतांश पर्यटक होते. कुटुंबीयांच्या डोळ्यादेखत नाव आणि धर्म विचारात दहशतवाद्यांनी हे कृत्य केले होते. ‘आम्ही कपाळावरची टिकली काढली पण आमचे कुंकु हरपले’, अशी प्रतिक्रिया पहलगामच्या हल्ल्यातून  वाचलेल्या महिलांनी दिली होती. त्यामुळेच या कारवाईचे सांकेतिक नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ असे ठेवले होते. तसेच, पंतप्रधान मोदी स्वतः रात्रभर ‘ऑपरेशन’ सिंदूर’ लक्ष ठेवून होते, असेही सूत्रांनी सांगितले. पहलगाममध्ये अनेक पर्यटक कुटुंबीयांसह आले होते. यामध्ये अनेक नवविवाहित होते. अवघ्या चार-आठ दिवसांतच काही वधूंना कपाळावरील कुंकू पुसावे लागले होते. त्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली होती. नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नीचे छायाचित्र दहशतवाद्यांचे क्रौर्य सांगून जात होते. नरवाल यांचे चार दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. रायपूरचे दिनेश मिरानिया आणि नेहा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. कानपूरमधील व्यापारी शुभम द्विवेदी आणि ऐशन्या यांचे फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होते. या तिघींच्याही पतींना दहशतवाद्यांनी अगदी जवळून गोळ्या झाडून मारले होते. या धक्क्यातून या तिघी अद्याप सावरलेल्या नाहीत. अशीच इतरही कुटुंबे अद्यापही सावरलेली नाहीत. कारण, या हल्ल्यात कोणी पिता, भाऊ, मुलगा, पती गमावला आहे.
 

Related Articles